पीएम विश्वकर्मा योजना : 25 हजार लोकांनी केले होते अर्ज
वर्धा : बाराबलुतेदार घटकांतील वंचित आणि दुर्लक्षित कारागिरांसाठी केंद्र सरकारने पीएम विश्वकर्मा योजना अंमलात आणली. योजनेंतर्गत या कारागिरांना प्रशिक्षण देऊन त्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी व्यवसायासाठी कर्जही पुरविण्यात येते. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायतीमधील 25 हजार 354 कारागिरांनी अर्ज केले होते. त्यापैकी 5 हजार 302 पात्र कारागिरांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लोहार, कुंभार, सुतार, शिल्पकार, गवंडी, नाविक, चर्म उद्योग, धोबी, मच्छीमार, मासेमारीची जाळी तयार करणे आणि फुलांच्या माळा तयार करणे आदी 18 प्रकारच्या पारंपरिक कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणादरम्यान प्रतिदिन 500 रुपयांचा लाभ दिला जातो. प्रशिक्षणानंतर या कुशल कारागिरांना आपला स्वत:चा व्यवसाय उभारण्यासाठी 1 लाख, नंतर 2 लाख आणि 5 लाख रुपयापर्यंत 5 टक्के व्याजासह कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत आर्वी तालुक्यातील 73 ग्रामपंचायतींमध्ये आतापर्यंत 3 हजार 933 जणांनी नोंदणी केली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण करून अखेर 1 हजार 774 लाभार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. आष्टी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींपैकी 1 हजार 524 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 380 जणांची निवड करण्यात आली आहे. देवळी तालुक्यातील 63 ग्रामपंचायतींमध्ये 2 हजार 700 जणांनी अर्ज केले त्यापैकी 380 जणांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींपैकी 3 हजार 49 जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी 388 जणांची निवड झाली आहे. कारंजा तालुक्यातील 59 ग्रापंमधील 1 हजार 504 पैकी 232, समुद्रपूर तालुक्यातील 71 ग्रापंमधील 2 हजार 661 पैकी 558, सेलू तालुक्यातील 2 हजार 490 पैकी 378, तर वर्धा तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींमध्ये 7 हजार 493 अजार्र्ंपैकी 1 हजार 163 जणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.





