सोशल मीडियावर विषाणूबरोबर लॉकडाऊनची देखील चर्चा
पुणे : महाराष्ट्रात शिरकाव केलेल्या एचएमपीव्ही विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. या एचएमपीव्ही विषाणूने सर्वांची झोप उडवली आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळले आहेत. या नव्या व्हायरसमुळे अनेकांना कोरोना काळाची आठवण झाली आहे. नव्या विषाणूबरोबर आता लॉकडाऊनची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. मात्र, राज्यात लॉकडाऊन लागणार नसल्याची माहिती हाती आली आहे.
कोरोना महामारीनंतर लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या काळात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. कोरोना काळाच्या 4 वर्षानंतर पुन्हा एकदा नव्या विषाणूनं डोके वर काढलं आहे. या नव्या व्हायरसने जगभरातील लोकांची चिंता वाढली आहे. कोरोनानंतर एचएमपीव्ही नावाच्या विषाणूने चीनमधील लोकांची झोप उडवली आहे. ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस असे या विषाणूचे नाव आहे. चीनमधील या घातक विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत देखील अलर्ट झाला आहे. बेंगळुरूतील रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलीला एचएमपीव्ही विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या विषाणूचा शिरकाव आशियातील अनेक देशांमध्ये वाढत आहेत. 14 वर्षाहून कमी वयोगट असलेल्या मुलांना या विषाणूची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकात या विषाणूचे दोन रुग्ण आढळले आहे. आयसीएमआर आणि इंटीग्रेटेड डिसीज सर्विलेन्स प्रोग्राम नेटवर्कच्या माहितीनुसार, देशात इन्फ्लूएंजा सारख्या या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली नाही. या विषाणूला कोणीही घाबरण्याची गरज नाही. यासाठी आतापर्यंत कोणताही विशेष प्रोटोक़ल जारी करण्यात आलेला नाही. लहान मुले कुठेही फिरायला न गेलेले असतानाही विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. एचएमपीव्ही विषाणू अजिबात धोक्याचा नाही. कुठलाही लॉकडाऊन लागणार नाही. भारतात हा आधीपासूनच अस्तित्वात असलेला विषाणू आहे. प्रत्येक भारतीयांमध्ये या विरोधात लढणाऱ्या अँटीबोडीज आहेत. त्यामुळे भारतीयांनी घाबरण्याची गरज नाही. याशिवाय विषाणूमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी सांगितलं आहे. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनासारखा हा नवीन विषाणू नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. नागरिकांना मास्क वापरण्याची सक्ती नाही. मात्र खबरदारी म्हणून मास्क वापरू शकता, असेही सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी म्हटलं.





