गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील चोपनटोली येथे रायवंता कुसराम, मंतुरा उईके, वच्छला वालदे, मालीकराम टेकाम (सर्व रा. सुकपूर) यांची शेतजमीन आहे. या शेतजमिनीवर चोपनटोली येथील काही जणांनी पटाच्या दाणीसाठी जेसीबी चालवून जमिनीचे सपाटीकरण केले. याबाबतची तक्रार गोरेगाव पोलिसात सोमवारी (ता. १३) करण्यात आली आहे. सुकपूर येथील आदिवासींनी काबील कास्तकारी जमीन महसूल अधिनियम कलम ३६ ला अधीन राहून जमीन धारण केली आहे. या शेतजमिनीवर रायवंता कुसराम, मंतुरा उईके, गीता वट्टी, वच्छला वालदे, हरिश वालदे, मालीकराम टेकाम यांचा ४० वर्षांपासून कब्जा असून, ते भातपीक लागवड करीत आहेत. या जमिनीजवळून जाण्यायेण्यासाठी पांदन रस्ता आहे. मात्र, मन्साराम ठाकरे, हिरालाल देशमुख, छोटू रहांगडाले, गोपाल टेंभरे यांनी पांदन रस्त्यालगत असलेल्या शेतजमिनीवर जेसीबी चालवून बैलांचा पट भरविण्यासाठी शेतीचे धुरे, झाडे, गवत, लाकडाची झोपडी पाडून सपाटीकरण केले. या सपाटीकरणाने शेती, झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सपाटीकरण करणाऱ्यांना विचारणा केली असता, शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पीडितांनी पोलिसात केली आहे.
चौकशी करून न्याय द्यावा…
पोलिसांसह तहसीलदारांकडेही याबाबतची तक्रार केली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करावी, जमिनीचा सातबारा व नमुना आठ ‘अ’ नकाशानुसार न्याय द्यावा.
-रायवंता कुसराम, पीडित महिला.





