मुंबई : भारतात खेळवण्यात आलेल्या पहिल्याच खो-खो वर्ल्डकपवर भारतीय संघाने नाव कोरले आहे. भारत हा खो-खो चा पहिला विश्वविजेता संघ ठरला आहे. नवी दिल्ली येथे रविवार, 19 जानेवारी रोजी खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 38 गुणांच्या मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून प्रत्येक सामन्यात वर्चस्व राखणाऱ्या भारतीय महिला संघाने अंतिम फेरीतही अशाच प्रकारे चमक दाखवली. टीम इंडियाने नेपाळचा 78-40 असा पराभव करत विश्वचषकावर नाव कोरलंय.
खो-खो हा भारतीय खेळ असून या खेळाचा विश्वचषक पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. पहिला खो खो विश्वचषक 13 जानेवारीपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर सुरू झाला आणि पहिल्याच सामन्यात भारतीय महिला संघाने 176 गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा विजय मिळवला होता. या विजयासोबत टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व मिळवण्यास सुरुवात केली होती. टीम इंडियाने रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात दमदार कामगिरी करत विश्वचषक आपल्या नावावर केलाय. विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासून टीम इंडियाचा दबदबा भारतीय संघासाठी अंतिम सामना टफ असेल असे बोलले जात होते. कारण नेपाळप्रमाणेच खो खो संघही बलाढ्य आहे, परंतु भारतीय महिलांनी सामन्याच्या सुरुवातीपासून आपले वर्चस्व कायम ठेवले. भारतीय संघाने टर्न 1 मध्ये आक्रमकपणे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाने नेपाळच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेतला आणि 34-0 अशी मोठी आघाडी घेत सामन्याला सुरुवात केली. टर्न 2 मध्ये नेपाळवर आक्रमण करण्याची पाळी आली आणि या संघाने आपले खातेही उघडले पण भारताच्या बचाव करण्यात माहिर असलेल्या खेळाडूंनी नेपाळला सहज गुण मिळू दिले नाहीत.





