विनयभंग प्रकरण; रावणवाडी पोलिसांची कारवाई
गोंदिया : विनयभंग प्रकरणात एक वर्षापासून पसार आरोपीला रावणवाडी पोलिसांनी जेरबंद करून बेड्या ठोकल्या ही कारवाई गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी रजेगाव परिसरात करण्यात आली. सतीश जयलाल ठाकरे (वय 45, रा. बनाथर) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपीवर रावणवाडी पोलिस ठाण्यात 9 जानेवारी 2024 रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कलम 354 (अ), 506 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसांपासून तो पसार होता. विशेष म्हणजे तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे, दरम्यान रावणवाडी पोलिस गत एक वर्षापासून त्याचा शोध घेत होते. यासाठी प्रसार माध्यमांवर त्याची माहिती प्रसिद्ध करून खबऱ्यांकडून शोध घेत होते. तसेच त्याच्याविरोधात न्यायालयात कलम 299 सी.आर.पी. सी. प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. दरम्यान तो रावणवाडी पोलिस हद्दीत वावरत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे रावणवाडीचे त्यांच्या पथकाने आरोपीला गुरुवारी रजेगाव परिसरात अटक केली. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी ठोठावली असून त्याला भंडारा कारागृहात रवाना केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रावणवाडीचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील अंबुरे, पोलिस हवालदार अरविंद चौधरी, पोलिस शिपाई आशिष वैद्य यांनी केली.





