गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भिवखिडकी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याने आतापर्यंत गावातील कोंबड्या, बकऱ्या फस्त केल्या आहेत. तर मानवी जिवालाही या बिबट्यापासून धोका आहे. याबाबतची तक्रार ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली. पण अद्यापही वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त केलेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी वन विभागावर रोष व्यक्त केला आहे. भिवखिडकी हे गाव तिन्ही बाजूंनी जंगलांनी व्याप्त आहे. सायंकाळ झाली की बिबट्या गावाशेजारी येतो. खोडाई तलावाच्या दिशेने सदर बिबट्या येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. कधी-कधी तर हा बिबट्या येथील घरांमध्ये थेट प्रवेश करतो. पंधरा दिवसांपूर्वी योगेश मडावी यांच्या घरी बिबट्याने प्रवेश केला होता. रात्री घराच्या छपरात राजेशाही थाटात तो बसलेला होता. मडावी हे लघुशंकेसाठी उठले असता त्यांना तो दिसताच जिवाच्या आकांताने त्यांनी आरडाओरड केल्यावर बिबट्या पळून गेला. आजूबाजूची मंडळी जमली व बिबट्याला गावाबाहेर पिटाळून लावले होते. गेल्या सहा महिन्यांपासून आजपर्यंत या बिबट्याने गावातील अनेक कोंबड्या फस्त केल्या. त्यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.





