गोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी इयत्ता बारावी परीक्षेचा तिसरा दिवसही जिल्ह्यात कॉपीमुक्त राहिला. गुरुवार, 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या मराठी पेपरला जिल्ह्यातील तब्बल 191 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. गोंदिया जिल्ह्यातील 78 केंद्रांवरून परीक्षेला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एकूण 18 हजार 974 विद्यार्थी परीक्षा देत आहे. बारावीची परीक्षा निर्भय व कॉपीमुक्त व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे परीक्षेचा तिसरा दिवसही कॉपीमुक्त राहिला. परंतु तीनही पेपरला काही विद्यार्थी अनुपस्थित राहिले. मंगळवारी (दि. 11) इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला 283 विद्यार्थी अनुपस्थित होते. दुसऱ्या दिवशीच्या हिंदी पेपरला 90 विद्यार्थी तर गुरुवारी झालेल्या मराठीच्या पेपरला 191 विद्यार्थी अनुपस्थित होते. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 20, आमगाव तालुक्यातील 12, देवरी तालुक्यातील 9, गोंदिया तालुक्यातील 39, गोरेगाव तालुक्यातील 45, सालेकसा तालुक्यातील 6, सडक अर्जुनी तालुक्यातील 37 तर तिरोडा तालुक्यातील 23 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान तीनही दिवस एकाही परीक्षा केंद्रावर कॉपी किंवा अन्य गैरप्रकार घडलेला नाही. बारावीची परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक परीक्षा केंद्रांवर नजर ठेऊन आहेत.



