गोंदिया : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी गोंदिया- बल्लारशहा रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पास मंजुरी दिल्याची घोषणा केली. या प्रकल्पास तत्कालीन खासदार सुनिल मेंढे यांच्या कार्यकाळात DPR ला मंजुरी प्रदान करण्यात आली होती. सदर प्रकल्पास ४८१९ कोटी रुपये खर्च येणार असून या लोहमार्गाची लांबी २४० किमी आहे. नुकतेच वडसा गडचिरोली रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पोलाद नगरी असलेला गडचिरोली जिल्हा मोठ्या प्रमाणावर रेल्वेच्या नकाशावर आल्यामुळे खनिज पोलाद आणि प्रक्रिया केलेले लोखंडी मालवाहतूक सोइची होईल. भंडारा, गोंदिया, गडचीरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील भरपूर वनक्षेत्राला व वन्यजीव पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. उत्तर भारत व पूर्व भारत दक्षिण भारताशी जोडणारा हा रेल्वे मार्ग खूप सोयीचा झाल्यामुळे वरील क्षेत्रातील प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सोयीची झाली आहे. या चारही जिल्ह्यामधील खनिजे कोळसा मॅगनीज व पोलाद ची माल वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर गतिमान होणार आहे. त्यामुळे हे दुहेरीकरण या चारही जिल्हाच्या विकासाला वरदान ठरेल. या दुहेरीकरणासाठी खासदार सुनिल मेंढे यांनी भरपूर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विनी वैष्णवजी, केंद्रीय अर्थ मंत्री मा. निर्मला सीतारामनजी यांचे आभार मानले आहे. क्षेत्रातील सर्व जनप्रतिनिधी व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यानी माजी खासदार सुनिल मेंढे यांचे अभिनंदन केले आहे.





