मुकाअ एम. मुरूगानंथम यांचे आवाहन : दीडशे कर्मचाऱ्यांनी शपथ घेवून केली परिसर स्वच्छता
गोंदिया : प्रत्येक व्यक्तीने स्वच्छतेच्या बाबतीज जागरूक राहीले पाहीजे. जगात अनेक देश स्वच्छ आहे. कारण त्या देशातील नागरीक स्वत: घाण करीत नाही. आणि इतरांना घाण करू देत नाही. त्याचप्रमाणे श्रमदानातून स्वच्छतेची सवय बाळगून प्रत्येक व्यक्तीने आठवडयातून किमान दोन तास श्रमदानचा संकल्प पाळावा, असे आवाहन जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरूगानंथम यांनी केले.
स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत ‘महाश्रमदान – एक दिवस, एक तास, एक साथ’ हा उपक्रम राबविण्यात आला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रमिला जाखलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन खोटरे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश ताकसांडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राकेश चांदेवार यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ अतुल गजभिये यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. दरम्यान जिल्हा परिषदेतील 165 अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारत परिसरात श्रमदानातून स्वच्छता केली. श्रमदानापूर्वी सर्व विभागांना स्वच्छता करावायाच्या ठिकाणांचे वाटप करण्यात आले.

कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सभागृहाकडील परिसर, प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराकडील परिसर, कॅन्टीनकडील भाग आणि प्रशासकीय इमारतीच्या मागचा भागात श्रमदान केले. यासोबतच जिल्हा परिषदेतील अंतर्गत परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी स्वच्छता ही सेवा या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, दरवर्षी होणाऱ्या या उपक्रमामुळे अनेक गावे स्वच्छ होवू लागली असून नागरीकांमध्ये स्वच्छता राखण्याबाबत जागृती निर्माण होवू लागली आहे. हे या अभियानाचे यश असून येत्या 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांत ग्रामपंचायतींनी नागरीकांना सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सफाई मित्र सुरक्षा शिबीर 28 ला…
स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला 17 सप्टेंबर रोजी सुरवात करण्यात आली. 2 ऑक्टोबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. दरम्यान येत्या 28 सप्टेंबर रोजी सफाई मित्र सुरक्षा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात हे आरोग्य तपासणी शिबीर घेण्याचे पंचायत समितींना निर्देश देण्यात आले असून ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे यांनी केले आहे.
——





