गोंदिया : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यशोशिखर गाठता येते. तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील शेतकरी कुटुंबातील आणि शैक्षणिक पार्श्वभूमीचा वारसा लाभलेल्या डॉ. पंकज मनोहर पटले याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून यशोशिखर गाठले आहे. त्याने देशात 329 वा रँक प्राप्त केला आहे.
ठाणेगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पंकजचे वडील जिपचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक, आई गृहीणी यांच्या डॉक्टर सुपुत्राने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत देशात 329 व्या क्रमांकावर येण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे दुसर्या प्रयत्नात त्याने ही गरुड झेप घेतली आहे. पंकजचे प्राथमिक शिक्षण शहरातील शिशू मंदिर येथे झाले. 6 ते 12 वीपर्यंतचे शिक्षण नवेगावबांध येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयात झाले. यानंतर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळविली. यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात सेवा दिली. मात्र उच्च पदस्थ अधिकारी होण्याची जिद्द पंकजला स्वस्थ बसू देत नव्हती. यूपीएससीच्या परीक्षेची पूर्वतयारी स्वअध्ययनातून केली. केवळ पुणे येथे चाचणी परीक्षेसाठी वर्ग लावून मार्गदर्शन घेतले. पंकजचा लहान भाऊ विवेक एमबीबीएस डॉक्टर आहे. तोही युपीएससीची तयारी करीत ठाणेगाव सारख्या ग्रामीण भागातून शिक्षण घेणारा विद्यार्थ्याने त्याच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवून आयएएस परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल पंकजचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तत्कालीन जिल्हाधिकारीकडून मिळाली प्रेरणा….
स्वामी विवेकानंद, आईवडीलांना आदर्श मानतो. उच्चपदस्थ अधिकारी होण्याची जिद्द नवोदयला शिकत असतानाच मनी बाळगली होती. गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्याशी भेट झाली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून प्रेरणा मिळाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता युपीएससीच्या परीक्षेला समोरे जावे, प्रामाणिकपणे अभ्यास केल्यास यश निश्चितच मिळते. सरकारच्या योजना तळागळापर्यंत पोहचविणे ही आपली प्राथमिकता असेल.
डॉ. पंकज पटले, ठाणेगाव (तिरोडा)
नक्षलग्रस्त तालुक्यातून सचिनचे यश…
ग्रामीण भागातून पंकज पटले याने युपीएससीच्या परीक्षेत यश संपादन केले असतानाच जिल्ह्यातील आदिवासी बहूल नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातूनही सचिन गुणवंत बिसेन याने युपीएससी 2024 च्या परिक्षेत यश संपादन करून 688 वा क्रमांक पटकावला. दरम्यान, ग्रामीण भागातून आलो असलो तरी माझी ध्येयप्रेरणा कधी कमी झाली नाही. माझ्या यशाचे खरे श्रेय आईवडिलांच्या त्यागाला, गुरूजनांच्या मार्गदर्शनाला आणि स्वतःच्या मेहनतीला जात असल्याचे सचिनने सांगितले.





