स्वातंत्र्यदिनी अर्जुनी/मोर पोलिसांची कामगिरी
अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : हरविलेले मोबाईल परत मिळणे हे बहुतेक नागरिकांना अशक्यप्राय वाटते. मात्र अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याने अशक्य वाटणारे शक्य करून दाखवले. तांत्रिक कौशल्य, बुध्दीमत्ता आणि शिताफीच्या जोरावर पोलीस ठाणे अर्जुनी मोरगावने अंदाजे 1 लाख रुपये किमतींचे तब्बल १० महागडे मोबाईल शोधून काढले व स्वातंत्र्यदिनाच्या शुभप्रसंगी ते मूळ मालकांच्या स्वाधीन केले. हरविलेल्या मोबाईलच्या तक्रारी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. किशोर नखाते व पोलिस पथकाने केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) पोर्टलचा काटेकोर वापर करून हरविलेले मोबाईल हुडकून काढले. अवघ्या काही दिवसांत हरविलेले मोबाईल शोधण्यात आले ही पोलिसांच्या दक्षतेची आणि क्षमतेची ठळक उदाहरणे ठरली आहेत. ही कामगिरी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या थेट मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. या बातमीमुळे अर्जुनी/मोर पोलीस ठाण्याने “जनतेचे पोलीस” अशी प्रतिमा दृढ केली आहे.
विश्वास दुपटीने वाढला…
१५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या हस्ते मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात आले. आपली हरवलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. या घटनेमुळे पोलिसांबद्दलचा विश्वास दुपटीने वाढला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची आणि आपुलकीची भावना बळावली आहे.





