Sunday, January 18, 2026
spot_img

अप्रिय घटना टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे : जिल्हाधिकारी प्रजित नायर

कोरणीघाट रजेगाव बाघनदी येथे जिल्हाधिकारी यांची भेट
गोंदिया : गोंदिया जिल्हा हा निसर्गाने नटलेला जिल्हा आहे. मान्सून कालावधीत पूर परिस्थितीचे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा प्रशासन ताकदीने सज्ज आहे, मात्र जिल्ह्यात अप्रिय घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करावे, असे वक्तव्य जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी 19 जून रोजी महाराष्ट्र – मध्यप्रदेश राज्यच्या सीमेला लागून असलेल्या बाघ नदीवरील कोरणीघाट, रजेगाव येथे संभाव्य पूरपरिस्थिती असलेल्या भागाची पाहणी दरम्यान केले. जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. मान्सून कालावधी सुरु झाली असून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. म्हणून जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पूर प्रवण भागात भेट देवून मान्सून पुर्वतयारीच्या अनुषंगाने केलेले नियोजन व भौगोलिक परिस्थितीची पाहणी केली.यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत समशेर पठाण तहसीलदार गोंदिया, वैभव पवार पोलीस निरीक्षक रावणवाडी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, मंडळ अधिकारी, तलाठी व विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

ती घटना दुर्दैवी…
गोंदिया तालुक्यातील कोरणीघाट येथे दि.8 जून रोजी नदीपात्रात पाण्यात बुडून 3 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावेळेस जिल्हाधिकारी नायर यांनी सदर ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली व तात्काळ भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्देश दिले. यावेळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदिया तर्फे विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट कोरणी घाट रजेगाव यांना भाविकांच्या सुरक्षेसाठी अप्रिय घटना टाळण्यासाठी 10 नग लाईफ जॅकेट, 05 नग लाईफबॉय व एक रोप बंडल प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून प्रदान करण्यात आले. तसेच सदर ट्रस्टच्या सदस्यांना या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना आवश्यक ती सावधगिरी बाळगण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवावे…
पूर परिस्थितीवर मात करणे शक्य आहे. आपत्ती दरम्यान नागरिकांच्या कोणत्याही मदतीसाठी जिल्हा प्रशासन नेहमीच सज्ज आहे. प्रशासन व नागरिक हे समाजातील घटकाचे दोन बाजू आहेत, अश्या परिस्थितीत आपत्ती दरम्यान प्रशासनान व नागरिकांनी एकमेकांशी समन्वय ठेवून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्रित यावे, असे आवाहन पूर परिस्थिती पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी उपस्थित नागरिकांना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular