Friday, June 5, 2026

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य : जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले

पत्रकारांशी झालेल्या संवादात दिली माहिती
गोंदिया : जिल्हाधिकारी म्हणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रथम प्राधान्य राहील, असे नवनियुक्त जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापत सांगितले.
गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.मंगेश गोंदावले यांनी आज पदभार ग्रहण केला असून त्यांनी पहिल्याच दिवशी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ . गोंदावले हे वर्ष 2015 च्या बॅचच्या भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होते. मुळचे सातारा जिल्ह्याचे असलेले डॉ. गोंदावले यांनी इंडस्ट्रीयल इकॉनॉमिक्स या विषयात पी.एच.डी. केली आहे. विदर्भात काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रशासन हे लोकाभिमुख असले पाहिजे. प्रशासनात काम करीत असतांना त्याचे परिणाम प्रत्यक्ष दिसले पाहिजेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोंदिया जिल्हा हा धान उत्पादन जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान, बांबू, मोहफूल यांना प्राधान्य देवून बांबूपासून तयार करण्यात आलेल्या वस्तूंकडे विशेष भर येत्या काळात देण्याचा प्रयत्न असेल. नागरिकांचे जीवनमान उंचावयाचे असेल तर आर्थिक उन्नती करणे आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे-निमसरकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular